धाराशिव
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हया योजना रुग्णांना लाभ घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे.जिल्हयातील रुग्णांना विविध आजारावरील उपचार व शस्त्रक्रियांसाठी पैसे खर्च करण्याची वेळ येवु नये यासाठी आयुष्मान भारत योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे. असे मत आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिरात फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत कार्ड वितरणाचा आढावा घेतांना डॉ.शेटे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकुरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती साकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.शेटे म्हणाले की,जिल्हयातील जे रुग्णालये या योजनेअंतर्गत येत नाही परंतु त्यांच्याकडे रुग्णांना देण्यासाठी निकषानुसार सुविधा आहेत,त्यांना पण या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. रुग्णांचा जीव वाचविणे हे काम महत्वाचे असून,ज्या रुग्णालयात रुग्ण भरती आहे त्या रुग्णालयाला देखील या योजनेचा तसेच वयोवृध्द व्यक्तीना प्राधान्याने या योजनेचा तसेच लाभ देण्यात येईल.या योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी रुग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवेचा लाभ दयावा असे डॉ.शेटे यावेळी म्हणाले.

जिल्हयातील सर्व खाजगी रुग्णालयांना आरोग्य विभागाने आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची माहिती दयावी असे सांगून डॉ.शेटे म्हणाले की,त्यामुळे ते रुग्णालये देखील या योजनेत सहभागी होतील.ही योजना राबवितांना कोणत्याही उणीवा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यामुळे गरीबांना मोठया प्रमाणात या योजनेचा लाभ देता येईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी रेशनकार्ड अपडेट करुन घ्यावे. आरोग्य मित्राने रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या योजनेची माहिती द्यावी.रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तसेच नागरिकांना या योजनेची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तसेच कोणते रुग्णालय या योजनेत नोंदणीकृत आहेत याबाबतची माहिती जाणून घ्यायची असल्यास १८००२३३२२०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून जाणून घ्यावी. असे आवाहनही डॉ.शेटे यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की, जिल्हयातील जास्तात जास्त रुग्णांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हयातील सर्व खाजगी रुग्णालयांना या योजनेची माहिती देण्यात येईल.त्यामुळे जिल्हयातील अनेक रुग्णालये या योजनेत सहभागी होतील,असे ते म्हणाले.
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शासकीय १२ आणि १९ खाजगी रुग्णालये आहेत १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील ७१ हजार ८४३ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून उपचाराच्या दाव्यापोटी १४३ कोटी ३२ लक्ष ३३ हजार रुपये राज्यातील विविध रुग्णालयांना अदा केले तर १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ दरम्यान जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयात २० हजार ७४१ रुग्णांनी उपचार घेतले.या उपचाराच्या दाव्यापोटी ९ कोटी १३ लाख रुपये रुग्णालयांना अदा केले.जिल्ह्यात मार्च २०२५ अखेर ३ लक्ष ८६ हजार ४९९ कार्ड वाटप करण्यात आल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ आहेर यांनी सादरीकरणातून यावेळी दिली.
या सभेला योजनेत नोंदणीकृत असलेले जिल्ह्यातील १४ खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.